लोकमान्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष
लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दी निमित्ताने लेखक: प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी ( ९८ ५०८३०२९०) भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील थोर नेते म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जगभर ओळख आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळक कालवश झाले.त्यांची स्मृतिशताब्दी शनिवार ता.१ ऑगस्ट २०२० रोजी आहे. २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील चिखली या गावात जन्मलेले टिळक हे एक असामान्य व्यक्तीमत्व होते.त्यांचा काळ ‘टिळक युग’म्हणून ओळखला जातो.लोकमान्यांच्या निधनानंतर २७ वर्षांनी भारत स्वतंत्र झाला.पण स्वातंत्र्याची तयारी लोकमान्यांनी मोठया जनजागरणाने केली होती.म्हणूनच भारतासह जगभरच्या अनेक पारतंत्र्यात खितपत पडलेल्या देशांना त्यांच्या राष्ट्रकार्यातून साम्राज्यवादी शक्तींविरोधी लढण्याची प्रेरणा मिळाली हे ऐतिहासिक सत्य आहे. टिळकांच्या आईचे नाव पार्वतीबाई तर वडिलांचे नाव गंगाधर होते.टिळकांचे मूळ नाव केशव असे होते पण ते बाळ यानावानेच ओळखले गेले.टिळकांचे वडील शिक्षण खात्यात नोकरीला होते.१८६६ साली त्यांची बदली पुण्याला झाली आणि साहजिकच कुटुंबही तेथे आले.टिळक पुण्यात शिकले,वाढले.